
बीपीएल-एपीएल कार्डधारकांना मोठा दिलासा; निकषांच्या फेरविचारानंतरच पुढील निर्णय : मंत्री रिजवान हर्षद
बेळगाव : राज्यातील बीपीएल आणि एपीएल रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांत एकही रेशन कार्ड रद्द केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली असून, बीपीएल कार्डच्या निकषांचा फेरविचार केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रिजवान हर्षद यांनी दिली.
बीपीएल कार्डच्या माध्यमातून धान्याबरोबरच विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये काही अपात्र लाभार्थी असल्याचे आढळून आले असले, तरी सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत बीपीएलसाठी लागू असलेले निकष जुने ठरत असल्याचे मंत्री हर्षद यांनी स्पष्ट केले.
विद्यमान निकष कायम ठेवल्यास आर्थिकदृष्ट्या पात्र असलेली अनेक कुटुंबे बीपीएल यादीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदललेली आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन निकषांमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. केवळ जुन्या निकषांच्या आधारे पात्र गरीब कुटुंबांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.
त्यामुळे बीपीएल कार्डच्या निकषांचा सखोल फेरविचार करूनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत पुढील तीन महिन्यांत कोणतेही बीपीएल अथवा एपीएल रेशन कार्ड रद्द केले जाणार नाही, असे मंत्री हर्षद यांनी स्पष्ट केले.

Belgaum Varta Belgaum Varta