चंदगड : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर जंगली हत्ती धुमाकूळ घालत असून अन्नासाठी शेतात भटकत असून पिकांची नासधूस करत आहे. रात्रीच्या वेळी या भागातील केळी, नारळ, ऊस यासह इतर पिके नष्ट करीत आहेत. जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ही कर्नाटक आणि महाराष्ट्राची सीमा असल्याने हत्ती दिवसा घटप्रभा नदी ओलांडून महाराष्ट्रातील वनक्षेत्रात जात आहेत आणि रात्री कर्नाटकातील घटप्रभा नदीच्या काठावरील शेतात येऊन पिके उद्ध्वस्त करीत आहेत. वनविभागाचे अधिकारी हत्तीला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत, दोन-तीन कर्मचारी येऊन हत्तीला पिटाळून महाराष्ट्राच्या दिशेने पाठवतात. मात्र पुन्हा शेट्टीहळ्ळी व परिसरातील गावातील शेतात रात्रीच्या वेळी येऊन हे हत्ती पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करण्यास जाण्यास घाबरत आहेत. या हत्तींचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी शेतकरी विठ्ठल पाटील, उत्तम पाटील, प्रकाश पवार, राजन कलाविकट्टे, रमेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.