Sunday , September 20 2026
Breaking News

खानापुरात सोमवारी हुतात्म्यांना होणार एकत्रित अभिवादन!

Spread the love

खानापूर (वार्ता) : 1956 मध्ये मराठी भाग कर्नाटकात डांबल्यामुळे सीमाभागात झालेल्या आंदोलनात मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारगडी, नागाप्पा होसुरकर, कमलाबाई मोहिते यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार दि. 17 जानेवारी रोजी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जाणार, अशी माहिती माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मरक येथे पत्रकार परिषदेत दिली.
खानापूर म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्र येऊन सोमवारी हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत असे पत्रक काढण्यात आले आहे. सदर पत्रकावर दोन्ही गटाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या स्वाक्षर्‍या देखील आहेत.
सदर पत्रक खानापूर तालुक्यातील जनतेच्या हातात देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तालुक्यात दोन्ही गट एकत्र आल्याने समिती प्रेमी मराठी जनतेतून समाधान व्यक्त होत आहे, असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी यावेळी सांगितले.
समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव यांच्या स्वाक्षरीनिशी एकत्र हुतात्मा दिन करू असे पत्र समितीचे नेते माजी ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक पाटील (करंबळ) आणि कृष्णा कुंभार (शिंगीनकोप) यांनी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या निवासस्थानी दिले. त्याला लागलीच दिगंबर पाटील यांनी संमती दर्शविली, असे यशवंत बिर्जे यांनी सांगितले आणि याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, पुंडलिक पाटील, रुक्माणा झुंजवडकर, कलराम पाटील, कृष्णा कुंभार आदी नेते उपस्थित होते.
शुक्रवारी सीमाभागात हुतात्मा दिनाचे पत्रक वाटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *