
खानापूर : गाऊन घालण्यावरून झालेल्या वादातून पत्नीला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नंदगड पोलिसांनी अटक केली आहे.
खानापूर तालुक्यातील करजगी गावच्या रहिवासी श्रीमती संतोषी नारायण भातखांडे (55) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 19 एप्रिल रोजी रात्री बेळगावच्या बिम्स रुग्णालयात जाऊन तक्रार दिली, त्यानंतर नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोषी यांनी दिलेल्या तक्रारीत, पीडित मंजुळा (27) हिचा विवाह सुमारे आठ वर्षांपूर्वी हत्तरवाड गावच्या कृष्णाजी परशराम पाटील याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती कृष्णाजी, सासरा परशराम पाटील, सासू रेणुका पाटील आणि दीर सोमनाथ पाटील हे मंजुळाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे.
19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नंदगड गावातील दुर्गानगर येथील भाड्याच्या घरात ही घटना घडली. “गाऊन घातला नाहीस तर सोडणार नाही,” अशी धमकी देऊन पती कृष्णाजीने वादावादी केली आणि काड्यापेटीने पेटवून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
गंभीर भाजलेल्या मंजुळाला सुरुवातीला बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नंदगड पोलिसांनी गुन्हा नोंद (क्र. 62/2026) करून बीएनएस-2023 च्या विविध कलमान्वये तपास सुरू केला आहे. डीएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकुमार एल. धर्मट्टी आणि पीएसआय एस.एस. बदामी यांच्या पथकाने 20 एप्रिल रोजी आरोपीला नंदगड बसस्थानकाजवळ अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta