

मुंबई : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ व इतर शुभकार्यांसाठी प्रवाशांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडून मोठा दिलासा देणारी योजना लवकरच सुरू होणार आहे. नवीन एसटी बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात एसटी बस थेट त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे.
ग्रामीण भागात आर्थिक अडचणींमुळे अनेकदा ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर किंवा इतर मालवाहू वाहनांमधून वऱ्हाडींची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि कायदेशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मालवाहू वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे परवानेही रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून शासनाने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस टप्प्याटप्प्याने विविध आगारांमध्ये दाखल होतील. त्यानंतर शेतकरी कुटुंबांसाठी लग्नसमारंभासाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची योजना अमलात येणार असून, यासंदर्भातील अंतिम नियम व अटी लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta