

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर सोमवारी सकाळी दुर्दैवी अपघाताची शोककळा पसरली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने साईदीप लॉजजवळील रस्त्यावर चालत असलेल्या वारकरी महिलांना धडक दिली. जखमींना तातडीने जेजुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तीन महिलांचा मृत्यू झाला.
मृत महिलांचा मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. अपघातातील चार जखमी महिलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
या दुर्घटनेमुळे जेजुरीत सुरू असलेल्या पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून वारकरी आणि भाविकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta