

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत.
पूंछ जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तसेच जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर रग्गी नाला परिसरात डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने अनेक वाहने अडकली. याचवेळी एका बसवर मोठी दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, दक्षिण सिक्कीममधील समरदुंगजवळील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातही मोठी दुर्घटना घडली. बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर विषारी वायूची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत किमान १० कामगारांचा मृत्यू झाला असून, १७ कामगार बोगद्यात अडकले आहेत.
नामची जिल्ह्यातील तिस्ता जलविद्युत प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्यातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेची माहिती घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta