Saturday , July 27 2024
Breaking News

चार महिन्यानंतर ओलांडली महाराष्ट्र बसने कर्नाटकाची सीमा!

Spread the love
रिक्षा व्यवसायिकांनी केला सत्कार : आंतरराज्य बससेवेमुळे सुटकेचा निश्वास
निपाणी(वार्ता) : कोरोनाचा संसर्ग, कोगनोळी टोलनाक्यावरील आरटीपीसीआरची सक्ती, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आगारांचा गोंधळ, महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांचा संप अशा विविध कारणांमुळे कर्नाटक महाराष्ट्रातील आंतरराज्य सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद होती. या काळात प्रवाशांसह नोकरदार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शिवाय वडाप वाहतुकीमुळे आर्थिक फटकाही बसला. अशा परिस्थितीत चार महिने बंद असलेली महाराष्ट्र बससेवा निपाणीतून  सुरू झाली. यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शिवाय यावेळी स्थानक परिसरातील रिक्षा व्यवसाय संघटनेतर्फे आलेल्या चालक-वाहक यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र बससेवा सुरू करण्यात आली होती. पण ही बस सेवा काही काळ सुरू राहिली. या काळात मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती प्रवाशांना करण्यात आली होती. पण महाराष्ट्रात अमॅक्रोन या नव्या लाटेची शक्यता असल्याने पुन्हा आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून सीमाभागातील गडहिंग्लज गारगोटी राधानगरीत होणारी महाराष्ट्र बसची वाहतूक थांबली. त्यानंतर रुग्ण संख्या घटूनही महाराष्ट्र बसेसना कर्नाटकात प्रवेश दिला गेला नाही. शिवाय कर्नाटकातील बसही सोडली गेली नाही. अशातच महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बस आगार सरकारकडे विलीनीकरण करावे, या मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे आंतरराज्य निर्बंध हटूनही महाराष्ट्र बस निपाणीत आल्या नव्हत्या.
महाराष्ट्रात अजूनही काही संघटनांचा संप असल्यामुळे निपाणीत सध्या किरकोळ प्रमाणात प्रमाणात महाराष्ट्र बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. चार महिन्याच्या विश्रांतीनंतर निपाणी बसस्थानकात महाराष्ट्र  बसने प्रवेश केला. राधानगरी आगाराच्या निपाणी-राधानगरी या बसने प्रवासी सेवा सुरू केली. यावेळी स्थानिक रिक्षाचालक वडाप संघटनांनी बसला पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच चालक वाहकांचा सत्कार केला. महाराष्ट्र बससेवा सुरू झाल्यामुळे नोकरदार, प्रवासी आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्रात परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपावरुन फूट पडल्याने कमी क्षमतेने बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार कोल्हापूरसह विविध आगारातून जादा बस सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
यावेळी निपाणी शहर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय तिप्पे, संजय अंबुसकर, रुपेश धुमाळ, वडाप संघटनेचे अध्यक्ष संदीप हेगडे, राजू कोळी, प्रभाकर शिरगण्णावर, संजय आवळे, गौस किल्लेदार विशाल हरेल, रामा खडके, सुनील वाडकर, जहांगीर किल्लेदार यांच्यासह  नागरिक रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *