
एप्रिलच्या उत्तरार्धात आठ योग; अधिकमासात लागणार ‘ब्रेक’
निपाणी (वार्ता) : प्रतीक्षेनंतर पुन्हा लग्नाचा बार उडणार असून सनई-चौघड्यांचा आवाज कानी पडणार आहे. एप्रिलमध्ये बुधवारपासून (ता. १५) शुभ मुहूर्तांना पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यानंतर लग्नसोहळ्यांना प्रारंभ होणार आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात आठ मुहूर्त आहेत.
१६ मार्चपासून लग्नासाठी शुभमुहूर्त नव्हते. अर्थात हा महिनाभराचा काळ बुडी म्हणून मानला जात असतो. या कालावधीत लग्नसोहळ्यांसह कोणतेही शुभकार्य केले जात नाही. आता मात्र सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत असल्याने १४ एप्रिलला खरमास संपणार आहे. त्यानंतर आता शुभ मुहर्ताना सुरवात होणार आहे. यानंतरच नागरिकांनी लग्नाच्या तारखा निश्चित केलेल्या असल्याने आता लग्नांचा बार उडणार आहे
——————————————————————-
विवाहासाठी केवळ १७ मुहर्त
लग्नासाठी १८ एप्रिलचा शुभ मुहूर्त आहे. एप्रिल आणि मे महिन्यातच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार असून, या महिन्याच्या कालावधीत विवाहासाठी १७ मुहूर्त साधले जाणार आहेत. प्रमुख विवाह मुहूर्त एप्रिलमध्ये १८, १९, २०, २१, २५, २६, २७, २८ आणि २९ एप्रिल या तारखांना आहेत. मे महिन्यात १, ३, ६, ७, ८, ९, १०, १३, १४ असे मुहूर्त आहेत.
——————————————————————–
‘यंदा अधिकमास असल्याने हिंदू पंचांगानुसार या महिन्यात विवाह सोहळे टाळले जातात. यामुळे १५ मे पासून महिनाभर विवाह मुहूर्त नाही. १८ जूननंतर पुन्हा विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त आहेत.’
– शरद जोशी, भटजी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta