
ऐन उन्हात आदमापूर, आडी दत्त देवस्थानकडे भक्तांची पाऊले
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात प्रत्येकजण कामाच्या मागे धावत आहे. त्यामुळे मनशांती मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ मन शांतीसाठी गावोगावातील विविध धार्मिक मंडळे आदमापूर, मेतके येथील सद्गुरु बाळूमामा, श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी आणि आडी येथील दत्त देवस्थानला भेट देण्यासाठी पायी दिंडी काढत आहेत. दिवसेंदिवस अशा दिंडीमध्ये वाढ होत असून गावोगावी भक्तीची मळे फुलत असल्याचे चित्र निपाणी भागात दिसत आहे.
जीवनाचे सार्थक होण्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा आहे. पण प्रत्येकाला वेळ अपुरा पडत असल्याने संतांच्या दर्शनासाठी जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे विविध मंडळांच्या माध्यमातून पायी दिंडी काढून देवदर्शनासह संतांचा सहवास करण्याची प्रथा वाढत चालली आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा कराड परिसरातील काही मंडळे वर्षातून एकदा तरी सद्गुरू बाळुमामा, श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी आणि दत्त देवस्थानाला भेट देत आहेत. दिंडीच्या मार्गावर मुक्काम करणाऱ्या गावात त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे दिंड्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. एकंदरीत धकाधकीच्या जीवनात परमार्थ महत्त्वाचा असल्याने त्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta