
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे होणारी जीवित व वित्तहानी थांबवण्यासाठी श्रीराम सेना (कर्नाटक) व त्रस्त निपाणीकातर्फे शुक्रवारी (ता.१७) नगरपालिकेवर मोर्चा काढून नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. आठवड्याभरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास ही जनावरे नगरपालिकेत बांधण्याचा इशारा आहे यावेळी देण्यात आला.
निवेदनातील माहिती अशी, शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसर, शाळेचा आवार आणि निवासी भागात जनावरांचे कळप ठाण मांडून असतात. त्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. या जनावरांच्या धडकेमुळे अनेक अपघात घडले असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात ही जनावरे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान करत आहेत.श्रीराम सेनेने प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘सार्वजनिक शांतता भंग’ आणि ‘निष्काळजीपणा’ या कलमांखाली फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. पकडलेल्या जनावरांचे तातडीने पांजरपोळ किंवा गो-शाळेत पुनर्वसन करून मालकांकडून दंड वसूल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाला ७ दिवसांची मुदत
प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ७ दिवसांनंतर आम्ही सर्व मोकाट जनावरे एकत्र करून ती थेट नगरपालिका कार्यालयाच्या आवारात आणून बांधणार आहोत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा श्रीराम सेनेतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी चिक्कोडी जिल्हाश्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष अमोल चेंडके, निपाणी तालुका प्रमुख अजित पारळे, तालुका कार्याध्यक्ष बबन निर्मले, अक्षय वाघेला, योगेश चौगुले, वैभव भाट, श्रीनंद तारळे, प्रशांत घोडके, विशाल जाधव, विजय पाथरूट, आकाश मल्हाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta