

निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील महामार्गावरील शाहूनगर भुयारी मार्ग सध्या वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र बनला असून, वाहन-धारकांसह नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना तासन्तास अडकून राहावे लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
शाहूनगर बोगद्याची रुंदी तुलनेने कमी असल्याने वाढत्या वाहतुकीचा ताण पेलणे कठीण झाले आहे. लहान टेम्पो अथवा कारगाडी सारखी वाहने बोगद्यातून संथगतीने जात असल्यास त्यांच्या मागे वाहनांची मोठी रांग तयार होते. परिणामी संपूर्ण भुयारी मार्गात कोंडी निर्माण होते.
दुचाकीस्वारांनाही पुढे जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने अनेकांना वाहन बाजूला लावून पायी मार्ग काढावा लागतो. यामुळे नोकरीसाठी जाणारेकर्मचारी, विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग यांना मोठा फटका बसत आहे.
उन्हाच्या कडकडीत तासन्तासअडकून पडलेल्या वाहनधारकांची दमछाक होत असून काही प्रवाशांनी तर वाहन सोडून पायी जाण्याचा पर्याय.
स्वीकारला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
——————————————————————-

‘शाहूनगर मार्ग हा शहरासह उपनगरांना ओडणारा प्रमुख मार्ग आहे. महामार्गाच्या पश्चिम बाजूस अनेक शासकीय कार्यालये, गटशिक्षणाधिकारी कार्यालये, मंगल कार्यालये तसेच मुरगूड मार्ग असल्याने या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या अरुंद भुयारी मार्गाचे रुंदीकरण करणे ही आता काळाची गरज बनली आहे.
-निकु पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta