
नियोजनानुसार विवाह मुहूर्ताची लगबग; बाजारपेठेतील उलाढाल वाढली
निपाणी (वार्ता) : तब्बल तीन वर्षांनंतर येत असलेल्या ‘अधिक मासामुळे यावर्षी लग्नसराईच्या नियोजनाची धावपळ उडाली आहे. येत्या रविवार (१७) पासून अधिक मासाला सुरवात होत आहे. त्यानंतर पुढील काळात विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नाहीत. त्यामुळे १७ मे पूर्वीचे मर्यादित मुहूर्त गाठण्यासाठी वधू-वर पित्यांची तयारी सुरू असून निपाणी परिसरात लग्नसराईचा हंगाम शिगेला पोचला आहे.
पंचांगानुसार, १७ मे ते १५ जून या काळात अधिक मास असल्याने मंगल कार्य वर्ज्य मानली जातात. त्यानंतर जुलैपासून गुरू व शुक्र ग्रहांचा अस्त आणि चातुर्मासाचा प्रारंभ होणार आहे. पुढे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही विवाह मुहूर्तावर मर्यादा येणार आहेत. सध्या काही दिवसांचेच मुहूर्त शिल्लक आहेत. ज्यांचे नियोजन आता चुकले त्यांना थेट २०२७ ची प्रतीक्षा करावी लागू शकते, असे पुरोहित बाळासाहेब यरनाळकर यांनी सांगितले. एकूणच अधिक मास आणि त्यानंतरच्या धार्मिक कालखंडामुळे यंदाची विवाहसराई धावपळीची ठरली असली तरी यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे.
——————————————————————-
व्यावसायिकांची कसरत
कमी कालावधीत अधिक विवाह असल्याने मंगल कार्यालये, केटरिंग, बँड पथक, फोटोग्राफर आणि वाहन व्यवस्थापन यांच्याकडे बुकिंगचा पाऊस पडत आहे. वाढत्या मागणीमुळे या सेवांच्या दरात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात आचारी आणि वेटर मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta