
प्रकाश भागाजे; जिनलक्ष्मी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानावर समाधान मानू नये. तर व्यवहारज्ञान, सकारात्मक विचार आणि ध्येयपूर्तीसाठीची जिद्दीने अभ्यास करणे आवश्यक आहे. दहावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळणबिंदू असून या काळात घेतलेले योग्य निर्णय आणि मेहनत भविष्यातील यशाची दिशा ठरवते, असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रकाश भागाजे यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकाश भागाजे म्हणाले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचे कार्य जिनलक्ष्मी संस्था करत आहे, हे समाजासाठी आदर्शवत आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमता ओळखून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवावा, असा प्रेरणादायी संदेश दिला. संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील यांनी, अशा उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना नवी प्रेरणा मिळते. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले.
संस्थापक सागर मिरजे यांनी, जिनलक्ष्मी संस्था आर्थिक विकासासोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन व मदत करण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास संचालक निलेश पाटील, प्रकाश पाटील, उदय पाटील, प्रवीण हावले, बहुबली पाटील, सुदर्शन खिचडे, बाहुबली खेमलापुरे, धनंजय खेमलापुरे, पोपट चौगुले, राजेंद्र बाबू गंगाई सर, नरसू जोगळे, गणेश नाजरे, अमर सातपुते, किरण नरवाडे यांच्यासह संचालक, सभासद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. बशीर मुजावर यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta