कर्नाटकच्या वाट्याचे पाणीही संपले : शहरवासीयांची पाण्यासाठी धावाधाव
निपाणी (वार्ता) : शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे व बदलत्या हवामानामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शुद्ध पाण्याची उपलब्धता हा एक अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. गेल्या महिन्यापासून शहरात आठवड्यातून दोन वेळा अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. तलावात पाणी असूनही नियोजन नसल्याने शहरवासीयावर पाणीटंचाईची समस्या ओढावली आहे. सध्या यमगरणी जॅकवेल जवळील वेदगंगा नदीतील पाणी असल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी धावा धाव करावी लागत आहे. याशिवाय टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
काळम्मावाडी करारानुसार यंदाच्या हंगामातील पाणीपुरवठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे वेद गंगा नदी कोरडी पडत चालली आहे. त्यामुळे जॅकवेल वरून जवाहर तलावात होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तलावातील पाणीही बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याने तिसरा हॉल्व उघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गाळ मिश्रित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील कुपनिलिकेचे पाणी सुरू असले तरी ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यानेच ही पाणीटंचाई उद्भवल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी रात्री अपरात्री पाणी सोडले जात असल्याने त्याची माहिती अनेक कुटुंबांना मिळत नाही. त्यामुळे पाण्यासाठी रात्रभर जागरण करावी लागत आहे. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाणीटंचाई उदभवली आहे. तरी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
—-
निपाणी पाणी समस्येची प्रमुख कारणे
शहराच्या वाढत्या गरजेनुसार पाणीपुरवठा योजनांचे योग्य व कालबद्ध नियोजन नाही. भूजल पातळीत होणारी घट आणि विंधन विहिरीतील पाणी कमी झाल्याने शहराची टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आले आहे. अनेकदा खोलवर गेलेल्या बोअरवेलच्या पाण्यात फ्लोराईडसारखी घातक मूलद्रव्ये आढळल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. निपाणी आणि परिसरातील हुन्नरगी, सिदनाळ, जुने ममदापूर) पावसाळ्यात पुराचा फटका बसतो. तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
—
‘सध्या वेदगंगा नदीतील पाणी पूर्णपणे खालावले आहे. त्यामुळे जवाहर तलावात होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. याशिवाय तलावातील पाणीही कमी झाल्याने शहराला गाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याकडे नगरपालिका आयुक्तांनी लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी.’
-दिलीप पठाडे, माजी नगरसेवक निपाणी
—-
Belgaum Varta Belgaum Varta