
विविध कार्यालयांना ठोकले टाळे ; आश्वासनानंतर आंदोलन मागे
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी. तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत. बेनाडी व मानकापूर गावातील रस्ते आणि गटारीच्या पाण्याचा निसरा करावा. याशिवाय तालुक्यातील विविध गावातील शेतक-यांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे गुरुवारी (ता.२८) कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीसह चाबूक मोर्चा काढला. याशिवाय तालुका पंचायत कार्यालय, पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर विविध खात्यातील अधिकारी आल्यावर चर्चा करण्यात आली. समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


अक्कोळ क्रॉस येथून मोर्चाला प्रारंभ झाला. जुन्या पी. बी. रोड मार्गे विविध घोषणा देत पाटबंधारे खाते आणि तालुका पंचायत खात्याच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. तेथे कुलूप ठोकून हे आंदोलन झाले.
राजू पोवार म्हणाले, शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आप्पाचीवाडी येथील पूल शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असूनही त्याकडे डोळेझाकपणा केला आहे. अधिकाऱ्यानी आश्वासन दिले असले तरी काम नाही झाल्यास पुन्हा रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे सांगितले. चुनाप्पा पुजारी यांनी, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून त्याकडे सर्वजण दुर्लक्ष करीत आहेत. आता रयत संघटना आणि शेतकरी आक्रमक बनले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयाचे अधिकाऱ्यांनी कामे न केल्यास रयत संघटना आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.
प्रांताधिकारी सुभाष संपवावी यांनी, आप्पाचीवाडी येथील पुलाबाबत शेतकऱ्यांची समस्या योग्य असून त्या कामासाठी ३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून समस्येच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाणी केली जाईल. येत्या चार महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिका-याना केली आहे. याशिवाय बेनाडी, मानकापूरसह इतर गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. अच्युत माने, किसन नंदी, मंजू पुजारी, मल्लाप्पा अंगडी, अशोक क्षीरसागर, सुधाकर माने, सूर्याजी पोटले, प्रकाश नाईक, महेश सुभेदार, मधुकर पाटील, प्रेम चौगुला यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
यावेळी शशिकांत पडसलगी, शिवानंद मुगलीहाळ, पंकज पाटील, सुजय पाटील, निकु पाटील, पांडू बिरनगड्डे, बाबुराव खोत, एकनाथ सादळकर, विश्वास आबणे, आनंदा गायकवाड यांच्यासह पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर, तहसीलदार सुरेश मुंजे, मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.
—————————————————————-
संत तुकारामांचा पालखी सोहळ्यातील बैलगाडी
गतवर्षी जगद्गुरु संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेली आप्पाचीवाडी येथील शेतकरी बाबुराव खोत यांची बैल जोडी व नक्षीकाम केलेली बैलगाडी प्रथमच रयत संघटनेच्या मोर्चात आणली होती. ही बैलगाडी मोर्चाचे आकर्षण ठरली.
Belgaum Varta Belgaum Varta