कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभा
निपाणी (वार्ता) : सध्याचे शिक्षण पूर्वीच्या शिक्षणापेक्षा खूप वेगळे असून जग वेगाने पुढे जात आहे आणि त्यामुळे, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तके आणि परीक्षांपेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांना विचार करायला, समस्या सोडवायला, संवाद साधायला, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कौशल्य-आधारित शिक्षण हे गरजेचे असल्याचे मत पेठ वडगाव येथील प्रा. सागर माने यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात शाळा प्रारंभोत्सव आणि शिक्षक पालक महासभा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्कूल बेटरर्मेंट कमिटी सदस्य अरुण निकाडे होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप्रज्वलन करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देवून स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण व पालकांना कृतज्ञता पत्र वितरण करण्यात आले. प्राध्यापक सागर माने म्हणाले मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थी व पालक यांची जबाबदारी, याबाबत सोदाहरण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रसंगी सेल्फी पॉईंट व आकर्षक सजावट करण्यात आली.
कार्यक्रम माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, नामदेव निकाडे, श्रीनिवास पाटील, शिवाजी चौगुले, कुमार माळी, नानासाहेब पाटील, अप्पासाहेब लोकरे, सीताराम चौगुले, नवनाथ पाटील, अमित खोत यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले तर के. ए. नाईक यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta