

‘अपसूर्य’ स्थितीचा अनुभव; डोळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या
निपाणी (वार्ता) : पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा पूर्णपणे गोल नसून ती लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्या मधील अंतर वर्षभरात कमी-अधिक होत असते. साधारणपणे ३ जानेवारीच्या सुमारास हे अंतर सर्वात कमी असते. या स्थितीला उपसूर्य (पेरिहेलियन) असे म्हणतात. त्यानंतर हे अंतर वाढत जाऊन जुलैच्या सुरुवातीला सर्वाधिक होते. या स्थितीला अपसूर्य (अपहेलियन) म्हणतात.यंदा अपसूर्याची स्थिती सोमवारी (ता. ६ रोजी अनुभवता येणार आहे.
सोमवारी सूर्योदयाच्या वेळी पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर सुमारे १५ कोटी २० लाख ८७ हजार ७०६ किलोमीटर इतके असेल. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचा आकार तुलनेने किंचित लहान दिसू शकतो. मात्र सूर्य जसजसा वर येतो, तसतसे त्याचे तेज वाढत असल्याने कोणत्याही परिस्थितीत सूर्याकडे किंवा टक लावून पाहू नये. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विरळ ढगांआडून काही क्षण सूर्याचे सुरक्षित निरीक्षण करता येऊ शकते. तरीही डोळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. उपसूर्य स्थितीत पृथ्वी-सूर्य अंतर सुमारे १४ कोटी ७० लाख किलोमीटर असते, तर अपसूर्य स्थितीत ते १५ कोटी २० लाख किलोमीटरपेक्षा अधिक असते. त्यामुळे या काळात सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी, उपसूर्य स्थितीच्या तुलनेत सुमारे १७ सेकंद अधिक वेळ घेणार आहे.
—————————————————————–
‘वर्षातून एकदाच येणारी ही वैशिष्ट्यपूर्ण खगोलीय घटना असून आवश्यक ती काळजी घेऊन तिचा अनुभव घ्यावा. शिवाय खगोलशास्त्रा विषयीची आवड वाढवावी.’
-एस. एस. चौगुले,
मुख्याध्यापक, सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली

Belgaum Varta Belgaum Varta