

निपाणी (वार्ता) : गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील बस स्थानकावर पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून त्याच्या आकारात वाढ झाली आहे. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह जवळ पाणी साठल्याने प्रवाशांना ये -जा करणे कठीण झाले आहे.

दहा वर्षांपूर्वी येथे आर्थिक बसस्थानक उभारण्यात आले आहे. केवळ तीन-चार वर्षातच या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. स्थानक परिसरात दरवर्षी खड्डे पडत असून त्याची डागडुजी केली जात नसल्याने खड्डे तसेच आहेत. याबाबत आगारप्रमुखांना प्रवाशासन विविध सामाजिक संघटनांनी निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. बस ये -जा करताना खड्ड्यातील गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर जात आहे. त्यामुळे चालक वाहक आणि प्रवाशांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी साठले आहे. त्यातूनच लघुशंखेसह इतर कार्यासाठी त्यातूनच ये -जा करावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशातून संतापाची लाट उसळली असून आगार प्रमुखांनी तात्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ती निकालात काढण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
—————————————————————–
‘आगार परिसरात पडलेले खड्डे उन्हाळ्यामध्ये बुजविण्यात आले होते. मात्र निरंतर बसच्या वाहतुकीमुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर ते खड्डे मुजवून सार्वजनिक स्वच्छतागृहा जवळ पाणी साठणार नाही, याची काळजी घेतली जाईल.’
–संगापा, आगारप्रमुख, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta