

पूरग्रस्त भागातील निधीच्या गैरवापराचा आरोप
निपाणी (वार्ता) : सिदनाळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील वॉर्ड नंबर २ मधील नागरिक नरक यातना सहन करावी लागत आहे. प्रभागामधील मरगुबाई गल्ली (हुन्नरगी रोड) येथील अंतर्गत रस्ते आणि गटारींची दुरावस्था झाली आहे. गेल्या १८ वर्षांपासून या भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असून, जिल्हा पंचायत कार्यालयाच्या आदेशालाही ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवल्याचा आरोप संतोष वराळे वर नागरिकांनी केला आहे. याबाबतचे निवेदन तालुका पंचायत कार्यालयाला पाठवले आहे.
या गल्लीतील काँक्रीट रस्ता आणि गटारींचे काम सन २००७-८ च्या सुमारास झाले होते. त्यानंतर आजतागायत तब्बल १८ वर्षे या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत रस्त्यावरील सर्व काँक्रीट निघून जाऊन रस्त्याला खडकाचे स्वरूप आले आहे. गटारी पूर्णपणे मुजल्या असून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काम न करताच फोटो दाखवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली आहे.
या भागातील चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारींमुळे सांडपाणी साचून राहत होते. याविरोधात स्थानिक नागरिक संतोष वराळे यांनी थेट जिल्हा पंचायत कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत जिल्हा पंचायतीने तालुका पंचायत आणि सिदनाळ ग्रामपंचायतीला तात्काळ काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आदेशानंतरही सिदनाळ ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
प्रकारामुळे वॉर्ड नंबर २ मधील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तात्काळ रस्त्याचे व गटारीचे काम सुरू न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष वराळे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta