

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधारा उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश मालगावे, रयत संघटनेचे आदिनाथ जंगटे, पंकज तीप्पणावर, भरत हवले, शितल गोरवाडे, पिंटू चौगुले, बाहुबली हवले यांचा समावेश होता.
निवेदनातील माहिती अशी, बोरगाव परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून दूधगंगा नदीवर बंधारा उभारण्याची मागणी करत आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळ्यात नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडत असल्याने शेतीसाठी सिंचन, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच ग्रामस्थांच्या पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण होते. त्यामुळे येथे तातडीने बंधारा उभारणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाची माहिती मागवून लवकरच बोरगाव येथील दूधगंगा नदीवरील बंधाऱ्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरगावच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटनेने सातत्याने केलेल्या पाठ पुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या साठी स्वाभिमानी रयत संघाचे राज्याध्यक्ष गणेश येलीगार गौरवाध्यक्ष दरिखान आज्जा यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta