

निपाणी (वार्ता) : भोज येथील गायरान हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वड्डर समाजातील १६ कुटुंबांना स्थलांतरित करू नये. त्यांना आहे, त्या ठिकाणी राहण्याची परवानगी द्यावा, अशी मागणी संबंधित कुटुंबीयांतर्फे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर -पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सर्व्हे क्रमांक ५१०/अ मधील १६ कुटुंबे अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असून ग्रामपंचायतीकडून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असताना ग्रामपंचायतीने स्थलांतराचा आदेश दिल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थलांतराचा आदेश मागे घेऊन कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मंत्री जारकीहोळी यांनी तत्काळ तालुका प्रशासनामार्फत भोज ग्रामपंचायत विकास अधिकारी शिंदे यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तसेच संपूर्ण प्रकरणाचा अहवालतातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सुप्रिया पाटील, राजेश कदम, सुजय पाटील, बाळासाहेब वड्डर, प्रदीप वड्डर, वसंत वड्डर, नागेश वड्डर, महादेवी वड्डर, रंजना वड्डर, अर्चना वड्डर, अनिता वड्डर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta