

निपाणी (वार्ता) : यंदा जुलै महिन्यातील सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आणि परिसरात गणेश मूर्ती कामाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.या पर्वात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती शाडूच्या मूर्तींपेक्षा थोड्या स्वस्त मिळत असल्या, तरी नागरिकांच्या मागणीनुसार शहर व परिसरातील मूर्तिकारांनी शाडूच्या गणेशमूर्तीवरही सुबकतेचे हात फिरवण्यावर भर दिला आहे. पीओपीपेक्षा वर्षानुवर्षे शाडूच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करून, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी अनेक कुटुंबांनी त्यासाठी नोंदणीस प्रारंभ केला आहे.
पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होते. याबाबत गेली अनेक वर्ष वाद- प्रवाद आहेत. सध्या शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग वाढली आहे. सहा इंचापासून १० फुटांपर्यंत बाप्पा साकारण्यास प्रारंभ झाला आहे. शाडू मातीच्या मूर्ती पीओपीच्या मूर्तींपेक्षा तुलनेने महाग असतात. त्यामुळे नागरिक पीओपी मूर्ती खरेदीकडे वळले आहेत. पण शाडूच्या मूर्ती या पर्यावरणपूरक मूर्तीचे पाण्यात सहज विसर्जन होते. श्रद्धेने पूजन केलेल्या मूर्तीची व्यवस्थित विसर्जन व्हावे, तसेच पर्यावरणास धोका पोहचू नये, यासाठी अनेक कुटुंबे शाडूच्या मूर्तीनाही प्राधान्य देत आहेत. त्यानुसार शहर व परिसरात शाडू मूर्ती बनविण्याच्या कामास वेग आला आहे. या मूर्ती हाताने तयार कराव्या लागतात. त्या साच्यातून काढल्या जात नाहीत. यंदा पावसाचे प्रमाणही कमी असल्याने त्या लवकर वाळाव्यात, यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
——————————————————————–
‘सार्वजनिक गणेश मंडळ आणि भाविकांच्या आवडीनुसार घरगुती आणि मंडळाच्या गणेशमूर्ती तयार करण्यावर नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे चार महिने अगोदरच भाविक देतील त्या चित्रानुसार शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला जातो. काही कुटुंब, तसेच गणेशोत्सव मंडळे आजही शाडूच्या गणेशमूर्तीनाच प्राधान्य देत आहेत.’
-अशोक साळवी,
मूर्तिकार, बुदलमुख
——————————————————————–
‘दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पीओपी गणेश मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जल प्रदूषण होते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने शाडूच्या मूर्तींची पूजा करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा.’
-नामदेव चौगुले,
पर्यावरणप्रेमी शिक्षक, निपाणी

Belgaum Varta Belgaum Varta