

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीनसह भाजीपाला आणि पिके धोक्यात आली आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली. मात्र त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिकाची वाढ खुंटत आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा आधार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.
उन्हामुळे शेतजमिनीत ओलावा कमी झाल्याने पिकाला आवश्यक पोषण मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी तणनाशक व खतांची फवारणी केली असली तरी पावसाअभावी त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. जून महिन्यातील तूट बाकी असताना जुलै
महिला अर्धा संपूनही पावसाने हजेरी लावली नाही. आधीच उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे मृग व आद्रा नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले आहे. मध्यंतरी जुलैच्या सुरवातीला आलेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपून घेतली. आता पुन्हा पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास सोयाबीन पिकाला जीवदान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिके धोक्यात येणार असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta