

निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदायिनी असलेल्या जवाहरलाल नेहरू तलावातील साचलेला गाळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तातडीने काढून जलाशयाची पाणी साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, येथील जवाहरलाल नेहरू तलावात अनेक वर्षांपासून गाळ साचल्याने जलाशयाची मूळ पाणी साठवण क्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी, दरवर्षी उन्हाळ्यात वैज्ञानिक सर्वे आणि पाण्याखालील खोलीचे त्रिमितीय मोजमाप या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रथम जलाशयाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून तज्ज्ञ संस्थेमार्फत आराखडा तयार करण्यात यावा. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, असा पर्यायही निवेदनात सुचविण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी राज्य, केंद्र शासन तसेच विविध जलसंधारण आणि नागरी विकासयोजनांमधून निधी उपलब्ध करून द्यावा.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलाशयातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढून शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दीर्घकालीन स्वरूपात सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय उपसलेल्या गाळाचा पुनर्वापर करून पर्यावरणीय व आर्थिक लाभही मिळू शकतील, असे प्रा. राजन चिकोडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रती श खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta