


निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह चारित्र्य संवर्धनाच्या उद्देशाने नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निपाणीतील डॉ. ऐश्वर्या खांडके यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे होते.
डॉ. खांडके म्हणाल्या, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ परीक्षेत अधिक गुण मिळविणे नसून चांगले चारित्र्य, उत्तम संस्कार, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे नियोजन, कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, पालक व शिक्षकांप्रती आदर, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची भावना या मूल्यांचा स्वीकार केल्यास प्रत्येक विद्यार्थी आयुष्यात निश्चित यशस्वी होऊ शकतो. डिजिटल, युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य असला तरी त्याचा विवेकपूर्ण व मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. वेळेचा अपव्यय टाळून नियमित अभ्यास, दर्जेदार पुस्तके वाचणे, वर्तमानपत्रांचे वाचन, योग, व्यायाम, ध्यान आणि चांगल्या मित्रांची संगत यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक व प्रेरणादायी उत्तरे देत शैक्षणिक प्रगतीबरोबरच चारित्र्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास सनातन संस्थेचे सुनील वाडकर, व्ही. डी. इंदळकर, टी. ए. घोसरवाडे, संदीप खोत, यू. पी. पाटील उपस्थित होते. पी. बी. कळंत्रे यांनी सूत्रसंचालन केले केले.


Belgaum Varta Belgaum Varta