


निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या साखर चोरीच्या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांना तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश असूनही पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत. त्याविरोधात ७ ऑगस्ट पर्यंत तपास न झाल्यास ८ ऑगस्टपासून मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्ट पर्यंत चौकशी न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. त्याला मंडल पोलीस निरीक्षक जबाबदार राहतील, अशी माहिती माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिली आहे.
प्रा. जोशी म्हणाले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये ५० हजार साखर पोत्यांचा हिशोब लागत नव्हता म्हणून तक्रार केल्यानंतर जीएसटी विभागाने साखर कारखान्याची चौकशी करून पाच हजार बेहिशेबी साखर पोती पकडून सुमारे ९६ लाख रुपयांचा दंड आकारला. त्यावेळी अहवालामध्ये ४५ हजार साखर पोत्यांचा हिशेब दिला गेला नाही. त्यानंतर निपाणी सिविल कोर्टात दावा दाखल केल्यावर कारखान्याच्या सर्व संचालकांना दोषी धरून त्यांना जामीनासाठी अर्ज करायला सांगितले.
संचालक सुकुमार पाटील यांनी जामीन घेतल्यावरया चौकशी विरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात अपील केली. तेथेही त्यांनाही स्टे-ऑर्डर दिला. उच्च न्यायालयाने काही दिवसांनी हा स्टे उठवून परत हे प्रकरण निपाणी सिव्हिल न्यायालयाकडे पाठवले. त्यानंतर सर्वांना नोटीस पाठवून मंडल पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. त्याविरुद्ध काही अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ५० हजार व त्यांचा हिशेब लागत नसल्याचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला. जिल्हा पोलीस प्रमुखांनी मंडळ पोलीस निरीक्षकांना याविरुद्ध चौकशी करा असा आदेश दिला होता. अद्यापही मंडल पोलीस निरीक्षकांनी कोणतीही चौकशी केलेले नाही. याविरुद्ध आंदोलन केल्याशिवाय पोलीस प्रशासनाला जाग येणार नसल्याचेही प्रा. सुभाष जोशी यांनी यांनी सांगितले.


Belgaum Varta Belgaum Varta