

निपाणी (वार्ता) : हुबळी विभागात निपाणी बस आगार उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. पण नादुरुस्त बसमुळे प्रवासी व विद्यार्थी हैराण झाले असून कोणती बस रस्त्यात कुठे बंद पडते हे समजणे कठीण झाले आहे. याशिवाय बसमध्ये गळती लागत असल्याने प्रवाशांना प्रवास भिजतच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वृद्ध व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन प्रवाशांना सुविधा देण्याची मागणी होत आहे.
निपाणी- इचलकरंजी आणि निपाणी- हुपरी या दोन मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने चांगले उत्पन्न मिळते. पण अलीकडच्या काही महिन्यात या मार्गावर खराब झालेल्या बस सोडण्यात येत असल्याने त्या रस्त्यावरच बंद पडत आहेत. त्यामुळे दुसरी बस येईपर्यंत विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही मार्गावरील बस सेवा कमी केल्या आहेत. उर्वरित मार्गावर खराब बस सोडण्यात येत असल्याने टायर फुटणे, कमान फाटा मोडणे, स्टार्टर न लागणे, रात्री दिवे बंद होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशांची अडचण होत आहे. शिवाय काही वेळा एकाच मार्गावर दोन पेक्षा अधिक बस एकाच वेळी सोडल्या जात आहेत. त्यामुळे त्या बस पुन्हा परत येईपर्यंत प्रवाशांना बसस्थानकातच थांबावे लागत आहे. तरी आगारप्रमुखांनी योग्य नियोजन करून बस सेवा देण्याची मागणी प्रवाशी विद्यार्थ्यातून होत आहे.
——————————————————————-
‘निपाणी आगारात बसचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांना तास चुकविण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तसेच नोकरदार वर्गांची गैरसोय होत आहे. त्याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन बस वेळापत्रकाचे नियोजन करावे.’
-हर्षल पाटील,विद्यार्थी, बेनाडी

Belgaum Varta Belgaum Varta