

निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याशिवाय विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ने ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गावातील विहीर संरक्षक कट्ट्याविना असल्याने गटारीचे पाणी त्यामध्ये जाऊन विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणारा चर्मकार, मातंग, व बौद्ध समाज या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र पाणीच दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटारी तुंबलेल्या अवस्थेत असून साफ करण्यासाठी कोणीही येत नसल्याचा आरोप ग्रामपंचायतवर करण्यात आला आहे.
रस्त्याला लागूनच कचऱ्याचे ढीग पहायला मिळत असल्याने डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना आमंत्रण देण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तुंबलेल्या गटारीची स्वच्छता करून विहिरीला संरक्षक भिंत बांधून द्यावी. रस्त्यावरील कचरा सर्वत्र विस्कटून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे दोन दिवसातून एकदा तरी कचरा उचलावा. कचऱ्या साठी कचराकुंड्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. याशिवाय स्मशानभूमी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दुर्गंधी कचरा नागरिकांच्या घरात जात आहे. त्यामुळे स्मशानभूमी गावाबाहेर हलवावी अन्यथा शिरगुप्पी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामविकास अधिकारी शिवानंद तेली यांना दोन ग्रामपंचायतीचा इन्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी कुन्नूर या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी व्यस्त असून शिरगुप्पीमध्ये आठवड्यातून एकदा दोनदाच फेरी मारली जाते.
यावेळी दलित महासंघ बेळगाव जिल्हा अध्यक्ष भरत रोड्डे, दलित महासंघ निपाणी तालुका अध्यक्ष दत्तात्रेय माने, मादर महासभा उपाध्यक्ष शंकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक केंगारे, उत्तम काळे, कृष्णात कोकरे, गणपती गस्ते, सागर महाजन, सुनील रोड्डे, विकास गस्ते, नामदेव कांबळे, यशवंत चव्हाण, चंद्रकांत गस्ते, संतोष महाजन, हिराबाई रोड्डे, महादेवी गाडीकर, सुशीला महाजन, आयेशा केंगारे, मंगल घस्ते, शारूबाई रोड्डे, प्रतिभा रोडे, स्वाती कोकरे, अरुणा कोकरे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta