


निपाणी (वार्ता) : निपाणीपासून जवळच असलेल्या बेनाडी येथील समुदाय भावना पासून येणारे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली केली होती. तहसीलदार सुरेश मुंजे, तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित ग्रामपंचायतला सांडपाणी विल्हेवाट लावण्याचे सूचना केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा सर्व अधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.२८) निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायतीने बेनाडी गावातील मुख्य रस्त्यावर मांग वाड्यातील गटाराचे पाणी पुढे वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येते. शेजारीच शाळा असून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाबत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पंचायतीला कळवले होते. ग्रामस्थांनी पंचायतीला लेखी स्वरूपात कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे काम न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
काहींनी कालवा अडविल्याने पावसाळ्यात कालव्याचे पाणी ओढ्यात न जाता मागासवर्गीय नागरिकांच्या शेतात जाऊन नुकसान झाले. याबद्दल सिंचन विभागाकडे चौकशी केली असता गावातील गटाराचे पाणी कालव्यात येते. या पाण्याचाही निचरा करून देण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पीडिओ, तलाठी आणि सेक्रेटरी यांनी दिले होते.
यावेळी अशोक क्षीरसागर, एजी कोटगे, कलगोंडा कोटगे, सचिन कोटगे, महेश क्षीरसागर, सिद्धाप्पा मिरजे, आप्पासाहेब मिरजे, प्रकाश नुले, आप्पासाहेब पाटील यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta