


निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न झाल्याने खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण दोन दिवसापासून झालेल्या पावसाने सोयाबीन, ऊसासह भाजीपाला पिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यावर्षी सातत्याने विश्रांती घेतलेल्या पावसाने मुळे मागील आठवड्यापासून सोयाबीन, मूग, उडीद, पिकासह अन्य पिके फुलासह पोषक अवस्थेत असताना कडक उन्हामुळे सोयाबीन पिकांना पाणी देण्याची वेळ आली होती. याशिवाय पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. परिसरातील सर्व पिके तरारून आली आहेत. केवळ पावसाअभावी वाया जाणारी पिके आता समाधानकारक दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले आहेत. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन समस्या निकाली काढली होती. पण सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पाण्याचा तीन आठवड्याचा खंड पाहून चिंतीत झाले होते. सध्या शेतकऱ्यांचा खरीप हाताशी येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta