


निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापर्यंत सुरू आहे. महामार्गामुळे महात्मा गांधी हॉस्पिटल, हरी कॉर्नर, यरनाळ, शिरगुप्पी परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांच्या सोयीसाठी खरी कॉर्नर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. पण त्यातील काही भाग पहिल्या किरकोळ पावसातच ढासळला आहे. त्यामुळे कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे करून नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा गांधी हॉस्पिटल व परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी गांधी हॉस्पिटल व खरी कॉर्नर दरम्यान उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यापासून सुरू आहे. पण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने जुलैच्या पावसातच पुलाचा काही भाग बुधवारी (ता.२९) कोसळला आहे. यावेळी रस्त्यावर वाहनधारक व नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना ठळली आहे. यापूर्वी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह येथील कार्यकर्त्यांनी चांगल्या दर्जाचे काम करण्याची सूचना संबंधितींना दिली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अद्याप शहरात बहुतांश ठिकाणी उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे घडलेल्या या घटनेची दखल घेऊन संबंधितांनी चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी नागरिक आणि वाहनधारकातून होत आहे.
——————————————————————–
‘परिसरातील ग्रामीण भाग आणि महात्मा गांधी हॉस्पिटलला जाणाऱ्या रुग्णांची सोय होण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. पण अद्याप काम पूर्ण न होताच भिंत कोसळणे हे शहरवासी यांचे दुर्दैव आहे. तरी संबंधित कंत्राटदारांनी तात्काळ त्याची दखल घेऊन चांगल्या दर्जाचे उड्डाणपूल निर्माण करावे.’
-ॲड. संजय चव्हाण, माजी नगरसेवक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta