
निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांची ७१ वी पुण्यतिथी १३ सप्टेंबरला नांदणी मध्ये होणार आहे. नांदणी संस्थान मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोज करण्यात आल्याची माहिती सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, दरवर्षी कर्नाटक महाराष्ट्रात ही पुण्यतिथी होते. परंतु नांदणी येथे मठ संस्थानामध्ये होणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवास ऐतिहासिक महत्व आहे. शांतीसागर महाराज यांचा सन १९२६ ला नांदणी मध्ये चातुर्मास झाला होता. त्यास २०२६ ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या मठाचे पूर्वाश्रमीचे भट्टारक आचार्यश्री विद्यासागर (अकीवाट) यांनी अकबर बादशहाच्या दरबारामध्ये जैनत्व सिद्ध केले. त्यांना बादशहानी ५२ बिरुदावली देऊन सन्मानित केले. त्यांची या सप्टेंवर मध्ये ५०० वी जन्म जयंती आहे.
या निमित्ताने दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी पुण्यतिथी साजरी केली जात आहे.
६ सप्टेंबर २०२६ रोजी युवती सक्षमीकरण शिबीर आयोजन करण्यात आले होते. शांतीसागर महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, विराचार्य बाबासाहेव कुचनुरे जीवन प्रदर्शन भरविले होते. पाठशाळा व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आणि मंगलाष्टक पाठांतर स्पर्धा व नृत्य स्पर्धा रक्तदान शिबीर घेण्यात आले. दीनदयाळ महाराष्ट्र शासन व पुण्यतिथी समितीद्वारे भव्य नोकरी मेळावा, कृषी व देशी गाय प्रदर्शन होणार आहे.
अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता शांती सदभावना रॅली काढण्यात येणार आहे. याशिवाय शांती, भक्ती संध्या,मोफत आरोग्य शिबिर, आचार्य, आर्यिका, मुनि, भट्टारक व मान्यवरांच्या उपस्थितीत शांतीसागर महाराज यांचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी १ लाख पेक्षा अधिक श्रावक सारिका उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी महाराजांचे समाज प्रबोधन पर आशीर्वाचन होणार आहे. या महोत्सव सोहळा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंत्री महोदय मान्यवर सर्व मठांचे भट्टारक यांचे प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले.
बैठकीस दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta