
रोहन साळवे ; धर्मवीर संभाजी चौकात निषेध सभा
निपाणी (वार्ता) : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची राज्यात वेगळी ओळख आहे. त्यांचा राजकीय दबदबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाचा राजकीय उद्देशाने त्यांच्यावर ईडीचा वापर केला जात आहे. विरोधकांना लक्ष करून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा केंद्राकडून प्रयत्न या
माध्यमातून जात आहे. ईडीचे अस्त्र दाखवून त्यांना बदनाम केले जात असून स्वच्छ कारभार असलेले मंत्री जारकिहोळी हे कधीही घाबरणारे नाहीत. काँग्रेसकडून अशा कारवायांना लोकशाही मार्गाने चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी व्यक्त केले.
गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणी अंमलबजावली संचालनालयाने (ईडी) बुधवारी विविध ठिकाणी छापे टाकल्याच्या निषेधार्थ निपाणी ब्लॉक काँग्रेसतर्फे येथील धर्मवीर संभाजी चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात आयोजित मानवी साखळी व निषेध जाहीर सभेत ते बोलत होते.
प्रारंभी पदाधिकारी व कार्यकर्त्यां तर्फे मानवी साखळी करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर या मानवी साखळीचे सभेत रूपांतर झाले.
निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम म्हणाले, राज्यात काँग्रेसते ज्येष्ठ नेते आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून सतीश जारकीहोळी यांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर केला जात आहे. याशिवाय मागासवर्गीय समाजातील प्रभावी नेत्यांना भाजपकडून सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया करून लक्ष केले जात असल्याचे सांगितले.
राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील म्हणाल्या, केंद्र सरकारने यापूर्वी राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या विरोधात केंद्रित तपास यंत्रणाचा वापर केला केला आहे. मात्र अशा कारवायांना काँग्रेस घाबरणार नसून लोकशाही मार्गाने त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. बुधवारी ईडीने मंत्री जारकीहोळी यांच्या संबंधित ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक बनली असून केंद्र सरकारचा सर्वत्र निषेध होत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर -पवार यांनी केंद्राकडून ईडीचे अस्त्र दाखवून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचे सांगितले. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी, ईडीच्या कारवाईमुळे मंत्री जारकीहोळी यांचे कधीही खच्चीकरण होणार नही. युवराज पोळ यांनी, पुढील मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून ओळख असलेल्या जारकीहोळी यांच्यावर ईडी सारख्या संस्थेकडून झालेली कारवाई चुकीचे असल्याचे सांगितले. अस्लम शिकलगार, रमेश जाधव, किरण कोकरे,वर्षां चव्हाण, प्रमोद पाटील यांनी मनोगतातून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta