ग्राम पंचायत सदस्या मनीषा परिट : ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी
कोगनोळी : येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या गावातील गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गावातील सर्व गटारी स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी उत्तम पाटील गटाच्या ग्रामपंचायत सदस्या मनीषा परीट यांनी केली आहे.
कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील गटारी मोठ्या प्रमाणात कचर्याने भरून गेल्या असून गटारीचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. गटारीचे पाणी गेल्या अनेक दिवसांपासून थांबून असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये आपण मागणी करून देखील याकडे सत्ताधारी गटाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील गटारी स्वच्छ होणे गरजेचे आहे. यासाठी ग्राम पंचायतीने लक्ष देऊन ताबडतोब गटारी साफ करून घ्याव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही ग्रामपंचायत सदस्या मनीषा परीट यांनी दिला आहे.
——————————————————
गावातील गटारी साफ करून घ्याव्यात अशी मागणी करून देखील ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी गटारी साफ न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येईल – सौ. मनीषा परीट, ग्रामपंचायत सदस्या कोगनोळी
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/05/IMG_20220529_10485162-640x330.jpg)