


दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात यंदाच्या खरीप हंगामातील भात रोपलागणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रोपलागणी पूर्ण केली असून आता पिकांच्या जोमदार वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दड्डी, मोदगे, खवनेवाडी, कोट, बेळळकी, धोंडगट्टे, गुडगनट्टी, शट्टीहळ्ळी, सलामवाडी आदी गावांतील शेतांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोपलागणीची लगबग सुरू होती. अनेक शेतकऱ्यांनी बैलांच्या साहाय्याने पारंपरिक पद्धतीने तर काहींनी आधुनिक कृषी यंत्रांच्या मदतीने शेतीची मशागत करून रोपलागणी पूर्ण केली. कुटुंबातील सदस्यांसह महिला मजुरांनीही मोठ्या प्रमाणावर श्रमदान करत या कामात मोलाचे योगदान दिले.
यंदा पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने भात लागवडीस पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, पुढील काळातही नियमित व संतुलित पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही भागांत तणनियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पिकांच्या निगेसाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी सुरू झाली आहे. भात हे दड्डी परिसरातील प्रमुख खरीप पीक असल्याने या पिकावर अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. यंदा हवामानाची साथ कायम राहिल्यास भरघोस उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta