डॉ. अलोक जत्राटकर : निपाणीत पत्रकार दिन
निपाणी (वार्ता) : सीमाभागातील जनतेचा आवाज म्हणून निपाणी भागातील पत्रकारांनी ध्येयवादी काम केले आहे. मात्र अलिकडच्या काळात जगणे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती येत आहे. अशा परिस्थितीत आपल्यासह कुटुंबाची पर्वा न करता पत्रकारांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. सध्याची पत्रकारिता भांडवलधारीवर अवलंबून राहिली जात आहे. अशा परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संविधानात्मक, मानवी मूल्यासाठी लिखाण करावे लागेल, असे मत कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर यांनी व्यक्त केले.
निपाणी भाग मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवारी (ता. 6) येथील शासकीय विश्रामधामात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राहुल पाटील होते. डॉ. जत्राटकर म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सार्वजनिक ग्रंथालय व वसतीगृहे सुरु केली त्यानंतर त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. सध्याच्या युगात दर्जात्मक बातम्यांची गरज आहे. पत्रकारामध्ये विविध बातम्यांबाबत स्पर्धा असावी. अमिषाला बळी न पडता गुणात्मक लिखाण करणाराच खरा पत्रकार आहे. यापुढील काळातही लेखणीची धार टिकविणे महत्वाचे आहे. प्रसार माध्यमामुळे पत्रकारिता सुरु झाली आहे. समाजातील वस्तूस्थितीची माहिती घेऊन केलेले लिखाणच उपयुक्त ठरते. प्रत्येकांनी आपले अस्तित्व अधोरेखित करणार्या बातम्यांचे लिखाण करावे. त्यावेळी शास्त्रोक्त विचार व्हायला हवेत. कोणत्याही बातम्यांचे वृत्तांकन करताना मुद्दा समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येकांनी प्रवाहावर लक्ष ठेवून काम केल्यास समाजासाठी काम होणार आहे. प्रारंभी डॉ. जत्राटकर व मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मावळते उपाध्यक्ष दादासाहेब जनवाडे यांनी स्वागत केले. मावळते सचिव नंदकुमार चेंडके यांनी वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महादेव बन्ने यांनी पाहुण्यांचा परिचय केला. महेश शिंपुकडे, अमोल नागराळे, इनायत शिरकोळी, विठ्ठल केसरकर, राजेश शेडगे व पत्रकार संघाच्या सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महांतेश पाटील यांचा सत्कार झाला. विजयकुमार बुरुड यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद इनामदार यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.