रयत संघटनेची मागणी : सहकार उपनिबंधकांशी चर्चा
निपाणी (वार्ता) : पडलिहाळ (ता.निपाणी) येथील पिकेपीएसला सन २०१३ साली ९० लाखाची पत मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ५५ लाख रुपये पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना जानुन बुजुन कर्ज देण्यात आले नाही. २०१८-१९साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी पडलीहाळ पिकेपीएसला १ कोटी ५१ लाख रुपये मंजुर केले. तरीही स्थानीक राजकारणामुळे शेतकऱ्यांना कर्जापासून वंचीत ठेवण्यात आले. या काळात सरकारने तीन वेळा कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. याबाबत पडलिहाळ येथील शेतकऱ्यांनी येथील शेतकऱ्यांनी रयत संघटनेच्या चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडली. त्यानुसार पोवार यांनी चिकोडीचे सहकार उपनिबंधक एम. जी. गुडप्पनावर यांच्याशी सविस्तर चर्चा करून येथील शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज कर्ज देण्याची मागणी केली. त्यानुसार गुडप्पनावर यांनी पिकेपीएसवरील प्रशासक गजानन लोकरे व संबंधित सेक्रेटरीना पिक कर्ज देण्याबाबत सूचना केल्या.
गेल्या काही वर्षापासून पडलिहाळ पीकिपीएसमध्ये जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यासाठी पिक कर्ज मंजूर केले जात आहे. पण याठिकाणी पदाधिकारी नसल्याने त्याची जबाबदारी प्रशासकावर पडली आहे. स्थानिक राजकारणामुळे अनेक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे त्यामुळे पीककर्जापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी महापूर व इतर कारणाने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत त्यांना पीक कर्जही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यापुढील काळात स्थानिक राजकारण बाजूला ठेवून गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मागणी राजू पोवार यांनी केली. त्यानुसार सहकार उपनिबंधक एम. जी. गुडप्पनावर यांच्याशी सविस्तर चर्चेनंतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसात पिक कर्ज वाटपाची सूचना संबंधित प्रशासक व सेक्रेटरीना करण्यात आल्या आहेत. पडलिहाळ शेतकऱ्यातर्फे याबाबतचे निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे निपाणी शहर सेक्रेटरी भगवान गायकवाड, संजय नाईक बाळासाहेब कांबळे, सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, पडलिहाळ येथील शेतकरी संजय जाधव, मानसिंग पाटील, रणजीत जाधव, सचिन पाटील, संभाजी पाटील, अरविंद पाटील, सतिश जाधव, संदीप चिमगांवे, एकनाथ पाटील, सोहन जाधव, समर पाटील, मारुती शेगळे, कुमार कोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.