
निपाणीकर घामाघुम; चार दिवसापासून उष्णतेची लाट कायम
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात मागील ४ दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. बुधवारी (ता.१५) पारा ४० अंशावर स्थिरावला. उष्म्यामुळे निपाणीकर घामाघूम होत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठ दुपारी ओस पडत आहेत.
एप्रिलमध्ये उन्हाचा कहर वाढला आहे. त्यामुळे हवेत तीव्र उष्मा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जिवाची काहिली होत आहे. अनेक शाळांना सार्वजनिक सुट्टी असूनही उन्हाचा वाढता कडाका बघता निपाणीकरांनी घरातच राहणे पसंत केले आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ यावेळेत उन्हाचा सर्वाधिक चटका बसत आहे. रात्री उशिरापर्यंत हवेत उकाडा टिकून रहात आहे.
उष्णतेपासून होणारी शरीराची लाहीलाही टाळण्यासाठी थंड पदार्थांची मदत घेतली जात आहे. भर उन्हात कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक डोक्यावर टोपी, पंचा परिधान करीत आहेत. तर महिलावर्ग स्कार्फ व सनकोटची मदत घेत आहेत. देशाच्या उत्तर भागातून तसेच समुद्री सपाटीकडून येणाऱ्या वाऱ्यात उष्णता टिकून आहे. त्यामुळे निपाणी सह सीमा भागात सरासरी तापमानात वाढ झाली आहे. चालू आठवड्यात हे वातावरण कायम राहताना उष्णतेचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————————-
बाजारपेठेवर परिणाम
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत तुरळक ग्राहक दिसत आहेत. त्याचा विविध व्यवसायावर परिणाम होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta