
उन्हाळी सुट्टीवर गदा ; मधुमेह, रक्तदाबाच्या शिक्षकांनाही ड्युटी
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांच्या परीक्षांपासून निकालांपर्यंत शिक्षकांना विविध कामे करावी लागतात. एप्रिल महिन्यात कामांचे प्रमाण वाढते. शिक्षण विभागाकडूनया कामांचा ताण वाढत असून त्यातच विविध प्रशासकीय कामांची भर पडत आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या या दबावामुळे शिक्षकांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे. महत्त्वाच्या कामांबरोबरच प्रशासकीय कामांचा भारही वाढला आहे. आता ऐन उन्हाळ्यात जनगणतीची कामे शिक्षकांना लावण्यात आले आहेत. हे काम १६ मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे शिक्षक जेरीस आले असून त्यांच्यावर मानसिक ताण वाढत आहे. शिवाय त्यांच्या उन्हाळा सुट्टीवरही गदा आली आहे.
उन्हाळ्यात एप्रिल महिना हा शाळांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.या काळात शैक्षणिक वर्ष संपत असल्याने अंतिम परीक्षा घेतल्या जातात. यानंतर लगेचच मूल्यमापन, गुणपत्रिका तयार करणे आणि अंतिम निकाल जाहीर करणे, ही कामे शिक्षकांना करावी लागतात. शिक्षण विभागाच्या नियमानुसार शिक्षकांना ही कामे जबाबदारीने पार पाडावी लागतात.
एप्रिल महिन्यात शिक्षकांवर विविध कामांचा ताण वाढला असून कामासाठी प्रशासनाकडून दबाव टाकला जात असल्याचे काही शिक्षक संघटनांनी सांगितले. त्यामुळे शैक्षणिक कामांवर परिणाम होत असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार काम हे अशैक्षणिक काम म्हणून वर्गीकृत केले आहे. अशा अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांना अशा कामांपासून कायम दूर ठेवण्याच्या मागणीसाठी बऱ्याचदा शिक्षण विभागाला निवेदन दिले आहेत. तरीही त्यांनाही काम लावले जात असल्याचे सांगितले जात आहे.
भर उन्हात जनगणतीचे काम करावे लागत असल्याने शिक्षक टोपी, छत्र्या वापरून हे काम प्रामाणिकपणे करत आहेत. मात्र त्यांना दिलेल्या विभागात नकाशानुसार अनेक गल्ली आणि भाग वेगवेगळ्या बाजूला आहे. त्यामुळे गणतीचे काम करताना त्यांची दमछाक होत आहे. याशिवाय याच महिन्यात विविध प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे शिवाय शिक्षक कुठे होते विवाह झालेली शिक्षिका कुठून आली आहे याबाबतची माहिती ही संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक ही कामे करताना मेटाकुटीस आले आहेत.
——————————————————————-
‘जनगणतीची कामे शिक्षकाऐवजी बेरोजगार सुशिक्षित युवकांना दिले असते तर त्यांना काम मिळून भत्ताही मिळाला असता. पण शासनाने याबाबत कोणताही विचार न करता थेट शिक्षकांना कामाला जिंकले आहे. यापुढील काळात तरी बेरोजगार सुशिक्षित युवकांना अशी कामे देऊन त्यांनाही सहकार्य करावे.’
-एक शिक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta