
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची तहान भागवणारी जीवनदाहिनी असलेल्या ‘जवाहरलाल नेहरू वॉटर वर्क्स’ या ऐतिहासिक जलाशयाला यंदा ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून जलाशयातील साचलेला गाळ काढून या ‘गंगेला’ मोकळा श्वास घेऊ द्यावा. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे असे पत्रक माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकातील माहिती अशी, नेहरू जलाशयाचा इतिहास निपाणी करांच्या एकजुटीची साक्ष देतो. नगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून दूरदृष्टीने निपाणीकरांना कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी या योजनेची आखणी केली होती. सन १९५१ मध्ये तत्कालीन नामदार मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी योजनेची पायाभरणी झाला. ही केवळ सरकारी योजना नव्हती, तर शासन, नगरपालिका आणि शहरवासीयांच्या एकत्रित ‘भगीरथ’ प्रयत्नांतून हा प्रकल्प उभा राहिला. जनतेचा सहभाग आणि प्रशासकीय इच्छाशक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून ही योजना कार्य झाली.
सध्याच्या स्थितीत या जलाशयाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. जलाशयात गाळ साचल्याने साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी विशेष निधी उपलब्ध करून देऊन यातील गाळ काढून तलावाला गत वैभव मिळवून देण्याची मागणी चिकोडे यांनी पत्रकात केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta