खरीप हंगामापूर्वीच दर गगनाला; उत्पादन खर्च वाढणार
निपाणी (वार्ता) : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी सुमारे १३५० रुपयांना मिळणारी खताची बॅग आता २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शेती करणे अधिक कठीण बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शेतकरी खरीप पिकांसाठी लागवडी दरम्यान रासायनिक खतांचा तीन टप्प्यांत वापर करतात. मात्र यंदा खतांच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. विविध खतांच्या किमतीत ३०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०:२०:०:१३ या खताची बॅग १३५० रुपयांवरून १९५० रुपयांपर्यंत, तर ९:२४:२४ खत १९०० वरून २२०० रुपयांपर्यंत वाढले आहे. अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट व इतर खतांच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र युरिया व डीएपीचे दर स्थिर आहेत.
दरवाढीमुळे केवळ शेतकरीच नव्हे तर कृषी सेवा केंद्र चालकही अडचणीत आले आहेत. महागडी खते खरेदी करून ती शेतकऱ्यांना विक्री करणे कठीण होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
—————————————————————
‘उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असल्याने रासायनिक खते खरेदी करणे कठीण झाले आहे. सरकारने खतांवर अनुदान द्यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.’
–संदीप तावदारे, शेतकरी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta