निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथील सिद्धार्थ तरुण मंडळा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक प्रबोधन, शिक्षण, संविधान जागृती आणि परिवर्तनवादी विचारांचा संदेश देण्यात आला. याशिवाय डी.जे., डॉल्बीला फाटा घेण्याचा निर्णय घेऊन शिक्षण चळवळीचा जागर करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून दंगलकार नितीन चंदनशिवे, नामदेव चौगुले उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मानवता, समता आणि करुणेच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी जयभीमच्या घोषणांमधून बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन केले.
नितीन चंदनशिवे यांनी, तरुणाईला शिक्षण, वाचन आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून स्वतःला घडविण्याचे आवाहन केले तर
नामदेव चौगुले यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासमोर तब्बल ३२ पदव्या होत्या. त्यांच्या संघर्षाचा आदर्श घेऊन आपल्या मुलांच्या नावासमोर किमान एक तरी पदवी लागावी, यासाठी प्रत्येक कुटुंबाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. बाबासाहेबांनी उभारलेली सामाजिक चळवळ केवळ जयंत्यांपुरती मर्यादित न ठेवता समाजाचा बौद्धिक विकास, आत्मसन्मान आणि उन्नती यासाठी उपयोगात आणणे काळाची गरज आहे. संविधान हा प्रत्येकाच्या जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ असून तो समजून घेतल्याशिवाय सामाजिक प्रगती शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी जयंतीच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १३५ झाडे लावण्याचा संकल्प केला.
नितीन चंदनशिवे यांनी, जयंती म्हणजे केवळ मिरवणूक, डी.जे. आणि डॉल्बी नव्हे. तरुणांनी भाषण स्पर्धा, लेखन स्पर्धा, वाचनालये, अभ्यास मंडळे उभारून समाजात वैचारिक क्रांती घडवावी. व्यसनांपासून दूर राहून बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारण्याचे आवाहन केले. यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta