निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पेरणीपुर्व मशागतीच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनाही मान्सूनचे आगमन कधी होते याची आस लागली आहे. अशावेळी कृषी खात्याने आवश्यक बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी हालचाली गतीमान केल्या असून निपाणी रयत संपर्क केंद्राने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १०० टन सोयाबीन बियाण्यांची मागणी केली आहे.
शहरातील वितरण केंद्रामध्ये खरीप हंगामासाठी निपाणीसह गव्हाण, तवंदी, यरनाळसह निपाणी कृषी कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या २९ गावांमधील शेतकऱ्यांना पाच वितरण केंद्रांच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे वितरीत केले जाणार आहेत. निपाणी शिरगुप्पी, गोंदीकुप्पी, अक्कोळ, शेंडूर, पांगिरे-बी, बुदलमुख, लखनापूर, पडलिहाळ, जत्राट, नांगनूर या गावांमधील शेतकऱ्यांना बियाणे वितरण होणार आहे. बुदिहाळ येथील केंद्रामध्ये बुदिहाळ, यमगर्णी व कोडणी येथील तसेच कुर्ली येथील केंद्रातून कुर्ली, भाटनांगनूर, आप्पाचीवाडी, सुळगाव हदनाळ, मत्तीवडे या गावातील शेतकऱ्यांना बियाणे वितरित केले जाणार आहेत.
सौंदलगा येथील केंद्रांमधून सौंदलगा, कोगनोळी, भिवशी येथील शेतकऱ्यांना तर बेनाडी येथील केंद्रामधून बेनाडी, आडी व हंचिनाळ केएस येथील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहेत. सदर बियाणे मे अखेरपर्यंत रयत संपर्क केंद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर वितरण सुरू करण्याचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.
——————————————————————–
‘शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. विशेषतः युरियाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जाणार आहे. मागणीनुसार पुरवठा राहील याची आम्ही दक्षता घेत आहोत.’
-दीपक कौजलगी, तालुका कृषी अधिकारी, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta