Monday , May 25 2026
Breaking News

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love

 

२८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार

निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मत्तीवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे.अन्यथा २८ मे रोजी निपाणीतील पाटबंधारे आणि तालुका पंचायत कार्यालयालाही घेराव घालून टाळे ठोकून आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. येथील रयत संघटनेच्या कार्यालयात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, तब्बल २५ वर्षांपासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या पुलाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.यापूर्वी ११ मार्च रोजी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने २० मे रोजी निपाणी येथील पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला. आता २८ मे रोजी हा निर्णायक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून परिसरातील शेतकरी बांधवांनी मोर्चात सहभागी आंदोलन यशस्वी करावे. हेआंदोलन केवळ पुलासाठी नसून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीची लढाई आहे. बेनाडी येथील मातंग आणि दलित समाजामध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. मानकापूर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, यासह शेतकरी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला जागे करण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल. न्याय मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा इशाराही पोवार यांनी दिला आहे.
यावेळी सर्जेराव हेगडे, कलगोंडा कोटगे, अशोक क्षीरसागर, महादेव कांबळे, बाबासो पाटील, सिद्धू मिरजे, गिरीश मिरजे, बाबासाहेब मगदूम, सूर्याजी पोटले, कृष्णात पोटले, आशिष करे, रामदास कटेकर, दिलीप कटेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वेदगंगा आटल्याने निपाणीचा पाणीप्रश्न गंभीर

Spread the love  कर्नाटकच्या वाट्याचे पाणीही संपले : शहरवासीयांची पाण्यासाठी धावाधाव निपाणी (वार्ता) : शहराच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *