
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील पाणी अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय सध्या पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून गाळ येत आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शिरगुप्पी ओढ्यातून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर टाकाऊ वस्तु आणि झाडे झुडपे उगवली आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वीच ओढ्याच्या परिसरात पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी शहरवासीयातून होत आहे.
अनेक वर्षापासून संभाजी नगरातील सचिन लोकरे या सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली युवक मंडळ व काही कार्यकर्त्याकडून पावसाळ्यापूर्वीच शिरगुप्पी ओढ्याची स्वच्छता केली जात होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जवाहर तलावात येत होते. पण लोकरे यांच्या निधनानंतर ही मोहीम थांबली आहे. सध्या ओढ्यासह तलाव परिसरात खराब झालेल्या गाद्या, कपडे, बाटल्या पडल्या असून झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात ओढ्यातून पाणी येणे कठीण होणार आहे. याशिवाय यंदा पाऊस कमी झाल्यास तलाव भरणे कठीण आहे. तसेच तलावात दूषित पाणी येण्याची शक्यता आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पावसाळ्यापूर्वीच ओढ्याच्या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी जोर जोर लागली आहे.
अनेक वर्षापासून होणारी स्वच्छता मोहीम सध्या थांबली आहे. त्याचा पाणीसाठ्यावर परिणाम होणार आहे. पाणीसाठा वाढवण्यासाठी ओढ्यातील पाणी महत्त्वपूर्ण असून नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ओढ्याच्या परिसरातील स्वच्छता करण्याची मागणी माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta