
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यातील साखर चोरीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपास जलद गतीने होण्यासाठी माजी आम. प्रा. सुभाष जोशी, संचालक सुकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना निवेदन देण्यात आले.
याविषयी माहिती देताना माजी आमदार प्रा. जोशी म्हणाले, श्री. हालसिध्दनाथ साखर कारखान्यातील साखर चोरीचे प्रकरण दडपण्याचा घाट घालण्यात आला होता. पोलीस चौकशीच्या विरोधात उच्च न्यायालयात कारखान्यांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून याची सखोल चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, संचालक मंडळ, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन साखर चोरी प्रकरणी सत्य बाहेर आणून दोषींवर कारवाईसाठी आवश्यक क्रम हाती घेण्यात यावी. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरुन त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांची यातून पायमल्ली होत असून या प्रकरणी सत्य समोर येईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक सुकुमार पाटील म्हणाले, कारखान्यात घडलेला साखर चोरीचा प्रकार कारखान्याच्या इतिहासाला कलंक आहे. यामध्ये सर्व संचालकांविरोधात नाहक तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, पोलीस चौकशीला सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत. पोलीस प्रशासनाने निपक्षपातीपणे तपास करून या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कडक कारवाई करावी. मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना याप्रकरणी सविस्तर माहिती देण्यात आली आहे पोलीस तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तळवार यांनी निवेदन स्विकारुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करु अशी ग्वाही दिली. यावेळी दत्तात्रय लाटकर, संजय वाघ, मुरुघेंद्र कल्याणशेट्टी, नितीन नेपीरे, शरद पाटील, अस्लम शिकलगार, चंद्रकांत पोकले, प्रशांत अक्कोळते, गुरुलिंग चिंचले, संतोष पाटील, बाबासाहेब ठोमरे, प्रकाश ऐवाळे, शकील सय्यद, ऋषिकेश शिंत्रे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta