
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. शिवाय सध्या पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून गाळ येत आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शिरगुप्पी ओढ्यातून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर टाकाऊ वस्तु आणि झाडे झुडपे उगवली आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वीच ओढ्याच्या परिसरात पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्याबाबतचे सचित्र वृत्त वार्ता मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. तात्काळ त्याची दखल घेऊन शनिवारीच दुपारनंतर जेसीबीच्या साह्याने ओढ्यातील केरकचरा टाकाऊ वस्तु आणि उगवलेली झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे पाऊस सुरू होताच शिरगुप्पी ओढ्यातून जव्हार तलावात पाणी येणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
अनेक वर्षापासून संभाजी नगरातील सचिन लोकरे या सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली युवक मंडळ व काही कार्यकर्त्याकडून पावसाळ्यापूर्वीच शिरगुप्पी ओढ्याची स्वच्छता केली जात होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जवाहर तलावात येत होते. पण लोकरे यांच्या निधनानंतर ही मोहीम थांबली होती. सध्या ओढ्यासह तलाव परिसरात खराब झालेल्या गाद्या, कपडे, बाटल्या पडल्या असून झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात ओढ्यातून पाणी येणे कठीण होणार असल्याचे माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांनी नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार तात्काळ नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्या सूचनेनुसार नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची इन्चार्ज प्रवीण कणगले कर्मचारी सर्जेराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पाऊस सुरू होताच तलावात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढणार आहे. गेल्या काही दिवसापासून बहुतांश प्रभागात गाळ मिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रात तुरटी टाकण्यासह इतर उपाययोजना कराव्यात. याशिवाय पावसाळ्यात गढूळ पाणी येण्याची शक्यता असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू पावसाळ्यापूर्वीच बदलून शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta