Saturday , May 30 2026
Breaking News

चोरी करून विकलेले ४ लाखाचे मोबाईल दिले मालकांना; निपाणी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आठवडी बाजार, यात्रा, जत्रा बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण सोडून देतात. मात्र निपाणी ग्रामीण पोलिसांनी केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ पोर्टलच्या मदतीने तब्बल ४ लाख रुपये किमतीचे २१ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत वर्षांसह अलीकडील तीन महिन्यांत मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारी गांभीर्याने घेत पोलिसांनी ‘सीईआयआर’ पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास सुरू केला. चोरीस गेलेले अनेक मोबाईल काही व्यक्तींनी कमी किमतीत खरेदी करून वापरत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत विविध ठिकाणांहून हे मोबाईल जप्त केले. एकूण २१ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे.
उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या मोहिमेत उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार आनंद कुंभार, महांतेश पाटील, रमेश शिलणवर, एम. एफ. नदाफ, मंजुनाथ खोत, रघू मेलगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
——————————————————————
जुना मोबाईल खरेदी करू नका

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास घाबरून न जाता त्वरित ‘सीईआयआर’ पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच जुना मोबाईल खरेदी करताना अधिकृत पावती, आयएमईआय क्रमांक आणि विक्रेत्याची माहिती तपासूनच व्यवहार करावा. यामुळे चोरीस गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधणे अधिक सुलभ होणार असल्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी

Spread the love  निपाणी (वार्ता) : आगामी निपाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *