१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
निपाणी (वार्ता) : आगामी खरीप हंगामात एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कमी व असमान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व वादळी पावसाच्या आधारे पेरणी करण्याची घाई न करता किमान १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन येथील कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात एल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पाऊस कसा होतो हे सांगता येणार नाही.सुरुवातीच्या पावसावर अवलंबून राहून पिरणी केल्यास उगवणीनंतर पावसाचा खंड पडण्याची शक्यता असून त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पेरणी करावी. पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून शेतकऱ्यांनी पेरणीबाबत संयम बाळगावा. योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. तसेच उपलब्ध बियाण्यांचा वैज्ञानिक पद्धतीने वापर करून उत्पादन खर्च कर्म करण्यावर भर द्यावा. कृषी विभागाच्य या सूचनांमुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना जोखीम कमी करून अधिक उत्पादन मिळविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
——————————————————————-
‘बाजारातील महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांनी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या घरगुती बियाण्यांची उगवण क्षमतेची चाचणी घ्यावी. योग्य उगवण क्षमता असल्यास बीजप्रक्रिया करून त्याचा बियाणे म्हणून वापर करावा. यामुळे उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल.’
–दीपक कौजलगी, कृषी अधिकारी, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta